AddThis code

Tuesday, April 26, 2022

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन सुरवात स्वतःपासून,घरापासून आणि कार्यालयातून - पर्यावरणतज्ञ प्रा.ऊदय गायकवाड(कोल्हापूर)



२१ व्या शतकामध्ये पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन सर्वात महत्वाचे बनले आहे. त्याची सुरवात स्वतःपासून,घरापासून आणि कार्यालयातून करणे गरजेचे आहे.

एस.एम.जोशी हॉल येथे चांगले विचार युवा व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प संपन्न झाले.
विषय होता पर्यावरण आणि बदलती जीवनपद्धती
पर्यावरणतज्ञ प्रा.ऊदय गायकवाड(कोल्हापूर) मुख्य वक्ता होते तर पर्यावरणात जीवन समर्पित करणारे दिलीप कुलकर्णी(दापोली कोकण) सर आणि स्मिताजी सोने (गुजरात ) हे प्रमुख अतिथी होते.
तरुणईचा व पत्रकार मंडळींचा व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला.

आपण आपल्या दैनदिन आयुष्यात खुप छोट्या छोट्या गोष्टीतुन आपल्या जवळपासचे जग सुंदर बनवु शकतो व पर्यावरणाची सतत होणारी हाणी, प्रदूषण व ईतर अनेक हानीकारक गोष्टी टाळु शकतो याबद्दल काही महत्वाचे मुद्दे यात मांडले गेले
1-महाराष्ट्रात आत्ता दुष्काळाच्या परिस्थितीत जेवढा पाऊस पडतो किंवा जो पाण्याचा अभाव आहे त्याहीपेक्षा 50%पेक्षा कमी राजस्थानच्या अनेक गावांमध्ये व ईतर ठिकाणी आहे पण त्यांनी ती परिस्थिती adopt केली आपणही व्यवस्थित नियोजन केले तर हे शक्य आहे . महाराष्ट्रात एवढा दुष्काळ पडला पाणी मिळत नाही पण दुष्काळी गावातही दारुची विक्रि कमी झाली का?
2. आपल्या घरी 30-50%पेक्षा जास्त वस्तु अशा असतात ज्या आपण कधी वापरतच नाही नवीन वस्तु आणण्यापुर्वी या वस्तु एखाद्या गरजुला द्यायल्या हव्यात.अनेक वस्तु तर अशा असतात कि आठवण म्हणून ठेवलेल्या असतात जसे कि घरातील. जुन्या धातुच्या वस्तु , पितळी हंडे वगैरे (आईने दिला याने दिला त्याने दिला वगैरे)
या न लागणार्या वस्तु नुसत्या बाहेर काढल्या तर एवढे धातु मिळतील कि आपल्याला कोणत्याही धातुची बाहेरुन आयात करण्याची गरज पडणार नाही
3)दैनदिन जीवनात वापरत असणारे कपडे हे आपण खादी किंवा कॉटनचे वापरले तरी बराच बदल घडु शकतो.
ऊदा.खादीचे कपडे तयार होताना कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही , जे रंग वापरतात तेही रासायनिक नसुन नैसर्गिक असतात सोबतच आपल्याच देशात हे तयार होत असल्यामुळे आपल्याच माणसांना रोजगारही मिळतो.खादी शक्य नसेल तर कॉटन तरी वापरावे.
4)पाणी
फक्क ब्रश करताना नळ अखंड चालु ठेवण्याऐवजी ग्लास वापरला तरी हजार लोकांमध्ये लाखो लिटर पाणी वाचु शकते.
गळणारे नळ नीट करुन घ्यावेत कारण पुण्याचा लोकसंख्येचा 20%पाणी जरी वापरले तरी कोट्यावधी लिटर पाणी वाया जाते जे वाचवले तर शेकडो गावांचा पाण्याचा प्रश्न मिटु शकतो.सुरवात स्वतःपासुन करा.
5)4Rचा वापर
Reuse
Recycle
and
Reduce
प्लास्टिकचा व ईतर अनैसर्गिक साधनांचा वापर कमीत कमी करा. नैसर्गिक वस्तु वापरा जसे कि लाकुड .ज्याचा आपण पुरेपुर ऊपयोग करु शकतो.
आपण जग बदलु शकत नाही हे माहीतच आहे पण जगातील एक छोटासा कोपरा तर बदलू शकू , एक छोट घर , गाव आणि स्वतः तर बदलु शकतो ना? त्यातुनच हळूहळू जग सुंदर बनण्याकडे वाटचाल होईल

संकेत मुनोत
8668975178
26 April 2016

Comment, Share ,Follow and Subscribe.








Sunday, April 24, 2022

सिगरेट चे व्यसन नेमकी काय कारण असावे?


#सिगरेट 
सकाळी मॉर्निंग वॉक नंतर नाश्ता करावा म्हणून जवळच्या स्नॅक्स सेंटर मध्ये गेलो..पोह्यांची ऑर्डर देणार तेवढ्यात जवळपास बघितले तर सगळीकडे नुसता सिगरेटचा धुर. जागा बदलूनही फायदा नव्हता  ४ पैकी ३ टेबलवर अशीच परिस्थिती म्हणून तिथून बाहेर पडलो. 
त्याला स्नॅक्स सेंटर म्हणावे की स्मोकींग सेंटर ते समजत नव्हते..त्या रेस्टॉरंट मध्ये मुख्य  काउंटरवर मोठे असे सगळ्या सिगरेटच्या बॉक्सेस असलेले  पॅकिंग जाहिरात करून लावलेले होते.जवळच 4-5 बिल्डिंग  सोडून एक मोठे कॉलेज आहे कदाचित त्याच्यामुळेही कदाचित हे केले असावे..
रेस्टॉरंट मालकाला विचारले की सकाळी समोरच्या गार्डन मधून फिरून येणाऱ्या लोकांना समजा इथे नाश्ता करायला यायचे असेल तर त्यांनी कुठे बसायचे? इथे काही No smoking Zone वगैरे आहे का? तर नाही म्हणाला ..पण जास्त लोक असतील तर आतमध्ये तात्पुरती खुर्च्या टाकून व्यवस्था करू शकू असे म्हणाला...

 सध्या  हुक्का आणि अनेक नव-नवीन ट्रेंड यात आले आहेत. तर त्याबद्दल आज सहज आठ्वलेल्या  काही गोष्टी ...

या व्यसनाची नेमकी सुरवात कुठून होते? ते माहित नाही पण मला वाटते काही ठिकाणी कुतुहलापोटी ती होत असावी. लहानपणी ५-६ वर्षाचा असताना एका धार्मिक शिबिरात सिगरेट , गुटखा , दारू वगैरे घ्यायचे नाही अशी शपथ घेण्यासाठी एका साधूंनी उभे राहायला सांगितले होते तेव्हा ती घेतली होती त्यामुळे कि गांधीविचारांमुळे कि आणखी कशामुळे माहित नाही पण मनात सिगरेट गुटखा ई. बद्दल आकर्षण नाही आणि पूर्वी तर इतरांचीही सोडवावी वाटे ...म्हणजे धर्माचा प्रभाव म्हणता येणार नाही कारण मी कितीतरी धार्मिक लोक सिगरेट पिताना पहिले आहेत.. ११ वीत असताना एका मित्राला "तु सिगरेट सोडणार असशील तर मी त्याबदल्यात तुला पैसे देत जाईल, तुझी काही कामे करत जाईल" असे म्हटलो होतो..असे आठवते.अर्थात मी म्हटलो म्हणून त्याने काही ते सोडले नाही..पण हीच तळमळ कायम राहिली आणि चळवळीत काही  लोकांची सिगरेट सोडवण्यात थोडेफार  यश मिळाले..

12वीत असताना एक वर्गमित्र सिगरेट ओढायचा तो म्हणायचा की 'तेरे नाम' चित्रपट पाहून त्याला सिगरेट प्यावी असे वाटू लागले..बी-फार्मसी करताना दुसऱ्या वर्षाला असताना एक रूममेट सिगरेट-दारू सगळेच करायचा ...त्याचे म्हणणे होते की "जिंदगी मे आये हो और ये नही किया तो क्या जिंदगी जिया? और जवानी में नही करोगे तो कब करोगे..?" त्यांच्या सोबत राहून १-२ शिव्या मी शिकलो होतो पण  सिगरेट वगैरे बद्दल तेव्हा ही आकर्षण वाटले नाही...बी फार्मसीतच शेवटच्या वर्षाला असताना आम्ही नाईट मारायचो (म्हणजे रात्रभर जागून पेपर चा अभ्यास करायचो) त्यावेळी  झोप लागू नये  म्हणून काही मित्र सिगरेट आणि हुक्का की त्यासारखे काही तरी ओढायचे त्यांचे म्हणणे असे होते की ते ओढल्याने झोप लागत नाही आणि Concentration लवकर होते पण मग मी आणि माझे काही मित्र तसे न करताही आमचा अभ्यास होतच होता ना? झोप आम्हालाही यायची पण ती येऊ नये म्हणून चहा वगैरे प्यायचो..
बी फार्मसी पूर्ण झाल्यावर  एका मोठ्या फार्मा कंपनीत २ महिने MR होतो तेव्हा तिथेही अनेक जण म्हणाले की  वरतून जास्त प्रेशर आले, कामाचा लोड असला की ओढावीच लागते सिगरेट, नंतर जवळपास 7-7.5 वर्ष IT कंपनीत (Semi IT )होतो तिथे तर सिगरेट चे स्पेशल Smoking Zone असायचे पण तेव्हाही कधी गरज पडली नाही.

लोक म्हणतात जेव्हा ब्रेक अप होते किंवा आयुष्यात एखादी खूप मोठी वाईट घटना घडते तेव्हा लोक व्यसनाकडे जास्त  वळतात... एकदा आयुष्यात अश्या मोठ्या धक्यातूनही जावे लागले म्हणजे त्यावेळेस मानसिक ताण एवढा होता की आत्महत्या करावी वाटे. त्यावेळेस काहींनी सरळ दारू आणि सिगरेट पिऊन मन मोकळे करण्याचा पर्याय सांगितला पण तेव्हाही त्याची गरज वाटली नाही...
 सध्या तर एका चळवळीतील मोठ्या व्यक्तीने चेष्टेने म्हणा किंवा प्रेमाने म्हणा असेही म्हटले कि तुला जर जास्त लोकात मिसळायचे असेल तर सिगरेट, दारू, मांसाहार वगैरे करावे लागेल ,आणि  प्रमाणात केले कि ते वाईट नसते,  व्यसनेच माणसांना एकत्र आणतात, त्यासाठी पुराणातील सोमरसा पासून ते आत्तापर्यतची अनेक उदाहरणे त्यांनी  दिली ..आपण यामुळे जास्त टॅक्स देऊन सरकार ला कसे सहकार्य करून देश उभारण्यात मोठा  उचलतो हेही सांगितले .. मी त्यांना उत्तर दिले नाही पण घेतलीही नाही अश्या वेळी मला गांधी आठवतात आपल्या कुणाही पेक्षा जास्त मिसळणारा हा व्यक्ती म्हणजे आजही जगात कुठेही जा गांधी माहित नाही असा माणूस दिसणार नाही.. त्याला का बर अश्या गोष्टींची गरज पडली नाही शिवाय त्यांच्यामुळे लाखोंनी अशी व्यसने सोडली म्हणजे सरदार पटेल गांधींना भेटण्यापूर्वी ब्रीज खेळायचे , सिगरेट प्यायचे ते सगळे त्यांनी गांधी भेटल्यावर सोडले....पण याच कारणामुळे सामाजिक चळवळीतील काही मित्र गांधींना मागासही म्हणताना दिसले आणि नेहरू आणि काही महापुरुष  सिगरेट पित होते म्हणून त्यांना आधुनिक म्हणत होते पण मला वाटत त्यांनी नेहरूही व्यवस्थित वाचलेले नसतात. नेहरूंनी स्वतः कधीही या गोष्टींचे समर्थन केले नाही ना कधी कुणाला तुम्ही असे व्यसन करा असे म्हटले..ती त्यांची मर्यादा होती..प्रत्येक व्यक्तीच्या काही मर्यादा असतात आपल्याही आहेत .. त्यांनी ज्या प्रमाणे आधुनिक भारताची निर्मिती केली जो त्याग आणि बलिदान दिले ते सोडून सिगरेटचा फोटो च फिरवणे हे चुकीचे आहे..
आता कुंभमेळ्यातील हजरो साधू सिगरेट, चिलीम आणि इतर तत्सम पदार्थ ओढतात आणि त्यांचे फोटो आदर्श म्हणून दाखवले जातात.. पण मला तर हे साधू वाटत नाहीत..संत तुकाराम, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अश्या व्यसनी लोकांचा पुरेपूर समाचार घेतला आहे..
असो जे मित्र सिगरेट पितात ते काही माझी शत्रू नाहीत. यातील अनेक मित्र मनाने बुद्धिमान आणि समाजासाठी चांगले काम करणारे आहेत आणि ते सिगरेट किंवा अन्य काही पितात म्हणून आमच्या मैत्रीत कधीही अडचण आली नाही 
पण मनापासून वाटते कि सिगरेट सोडण्यासाठी मनापासून प्रयत्न व्हायला हवेत. Smoking  तुम्हाला आणि तुमच्या जवळ राहणाऱ्या लोकांना सर्वानाच घातक आहे...
वरती माझे अनुभव सांगण्याचा हेतू हाच होता कि माझ्यासारखा अगदी सामान्य मनुष्य जर हे टाळू शकतो तर आपल्यापैकी कोणीही ते टाळू शकतो ..त्यापेक्षा करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत नाही का ?

चूकभूल क्षमस्व
संकेत मुनोत 
8668975178
changalevichar1@gmail.com
#randomthoughts
Comment, Share ,Follow and Subscribe.

Thursday, April 14, 2022

महावीरांना एक धर्म आणि त्याचे लोक यांच्यापूरते संकुचित न ठेवता तत्वज्ञ आणि विचारवंत म्हणून सगळीकडे मांडण्याची गरज- जैन जागृती 2019 मध्ये प्रकाशित लेख



महावीर कुठल्याही देवी-देवतेचा अवतार नव्हते ना महावीरांनी कधी कुठल्या चमत्कार वा अंधश्रद्धांचे समर्थन केले, उलट महावीरांनी त्या काळात चालत असलेल्या चुकीच्या प्रथा जसे कि यज्ञातील पशुबळी, स्त्रियांचे शोषण, ज्ञानावर एकाच वर्गाची मक्तेदारी इ गोष्टींना विरोध करून समतेचा संदेश दिला.मनुष्य जन्माने नव्हे कर्माने मोठा होतो हे स्वतःच्या संयमित जीवनातून दाखवून दिले.
जैन धर्म हा हिंदू किंवा कुठल्याही धर्माची शाखा नसून प्राचीन आणि स्वतंत्र धर्म आहे, महावीर हे जैन धर्माचे संस्थपक नसून 24 वे तीर्थंकर होते.
 "भ. महावीरांनी जगाला नेमके काय दिले?" या विषयावर  काही जैन मित्र मैत्रीणीशी संवाद झाला असता, महावीरांचे विचार आपल्याच धर्मातील अनेक लोकांना नीट माहित नसल्याचे पाहून आश्चर्य वाटले, "भ.महावीरांबद्दल नेमकी काय माहित आहे?" अस विचारल्यावर कुणी म्हणे ते विषारी सर्प चावल्यावर विचलित झाले नाही उलट पायातुन दूध आले तर कोणी म्हणे, त्यांच्या कानात खिळे ठोकले तरी ते शांत राहिले, राजमहाल सोडला त्यांनी, त्रिशला मातांना त्यांच्या जन्माच्या वेळी 14 स्वप्ने पडली इ, उपसर्ग आणि असच काही काही पण मूळ संदेश काय, त्यांच्या विचारांची जगाला नेमकी देणगी काय यावर कोणीच बोलेना?अनेकांतवाद, सर्वोदय हे शब्दच बहुतेकांना नीट माहित नव्हते.
फक्त अश्या कथापुरते मर्यादित ठेवून आपण महावीरांचे विचार फक्त आपल्या समाजापुरते धर्मा पुरते संकुचित करून ठेवतोय का?एक तत्वज्ञ म्हणून महावीरांचे विचार आपण अधिक पुढे आणायला हवे आणि व्यापक करायला हवेत
महावीर किंवा कुठल्याही जैन तीर्थकरांच्या हातात कुठले शस्त्र नाही, कुठली मौल्यवान आभूषणे नाहीत त्यांच्याजवळ गेल्यावर शांततेचा व प्रसन्नतेचा अनुभव येतो

महावीरांनी कधी ही कुणाला कसला श्राप दिला ना कुठल्या चमत्काराचे वरदान दिले
आज अनेक ठिकाणी  द्वेष, हिंसा, मत्सर, घृणा वाढत असतांना भ. महवीरांच्या विचारांची तीव्र गरज वाटत आहे.

महावीरांचा जन्म झाला तेव्हा काळ असा होता की सगळीकडे कर्मकांडाचे स्तोम माजले होते, मुक्या जीवांना यज्ञात बळी चढवले जात होते, स्त्री फक्त भोगवस्तू होती, पददलित आणि दुर्बलांना छळले जात होते. निवडक लोक विद्वत्तेची मक्तेदारी सांगत सामान्य जनांचे शोषण करत होते.सामान्य जणांना ज्ञान घेण्याचा वा देण्याचा अधिकार नव्हता.
महावीरांनी अशा काळात त्या सर्व पीडितांना दुर्बलांना बळ दिले शिवाय शोषण करणार्यांचा अहंगंड दूर केला. त्याकाळी विद्वान संस्कृत भाषा बोलत जी सामान्यजनांना समजत नसे पण महावीरांनी  सामान्य जनांशी अर्धमागधी या बोलीभाषेतून संवाद साधला, जसा ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून साधला.
कुठलाही धर्म म्हटले चिकित्सा करायची नाही किंवा प्रश्न विचारायचे नाही , जो कोणी प्रश्न विचारेल तो धर्मद्रोही असा आघात असतो, आज तर बहुतेक देशात सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांनाही देशद्रोही ठरवले जाते.पण भ. महावीर या उलट सांगतात.ते ईश्वरवादी किंवा वेद प्रामाण्यवादी सिद्धांत मांडण्याऐवजी बुद्धीप्रामाण्यवादी सिद्धांत मांडतात.
'पण्णा समीख्खए धम्मं' अर्थात धर्माची प्रज्ञेने समीक्षा करा असे भ. महावीर म्हणतात.त्यांनी माणसा-माणसातील वर्णावरून, लिंगावरून होणारी विषमता नाकारली. त्यांच्या सोबत श्रमण श्रमणी आणि श्रावक श्रविकांमध्ये राजापासून रंकापर्यत, म्हाताऱ्यापासून लहानापर्यत, पुरुष- स्त्रिया हे सर्व एकत्र होते त्यांच्यात कुठलाही भेदभाव केला जात नव्हता.

त्यांची आपल्याला रोजच्या जीवनात, समाजात नाते-संबंधात वावरतांना उपयोगी पडणारी तत्वे पाहूया

*लोकशाहीचा पाया- अनेकांतवाद:*
एखाद्या गोष्टीचा सर्वांगीण विचार म्हणजे अनेकांतवाद. परस्परांच्या मतांचा आदर करणे त्यात अभिप्रेत आहे.
आपल्यातील अनेक जण एखाद्या व्यक्तीबद्दल, महापुरुषाबद्दल, विचाराबद्दल पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेऊन जगत असतात.
म्हणजे माझ्या एखाद्या जवळच्याने सांगितलंय, परंपरेत आलंय, या-या पुस्तकात वा ग्रंथात आलय, घरातील कुणी जवळच्याने सांगितलंय म्हणजे हे असेच असेल ती जवळपास वावरणारी व्यक्ती असे-असे चुकीचेच असेल किंवा असे असे बरोबरच असेल अस मानून आपण मोकळे होतो.
पण बहुतेक वेळा सत्य ते नसते सत्य त्यापलीकडे असते.प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर आणि सर्व बाजु समजून घेतल्यावरच आपण मत बनवायला हवे.
अनेकांतवाद-अंत म्हणजे शेवट . एकान्त म्हणजे एकच शेवट. अनेकांतवाद म्हणजे अनेक शेवट. म्हणजेच कुठल्याही गोष्टीबाबत एकाच  बाजूचे मत न बनविणे..
अनेक व्यक्तीबद्दल आपण असे पूर्वग्रहदूषित मत बनवून चालतो त्यांच्याशी कधी प्रत्यक्ष संवाद साधत नाही आणि गैरसमज वाढत जातात.या अनेकांतवादाच्या मार्गाने आपण नातेसंबंध, समाज , देश आणि जग अधिक जवळ आणून ते अधिक समृद्ध करू शकतो.
 सोशल मीडिया चा वापर करतांना ही हे तत्व आपण अमलात आणले तर अनेक धोके टळू शकतात, काही ही फॉरवर्ड केल्यामुळे आजपर्यत अनेक लोकांच्या झुंडीकडून हत्या झाल्या त्या टाळता येणे शक्य होते.

अपरिग्रह:*
जेवढी गरज आहे तेवढाच संचय करायला हवा आपण अनेक वेळा गरजेपेक्षा अधिक संचय करतो.
आत्ताच्या काळाच्या हिशोबाने सांगायचे तर माझ्या मते तुम्ही तुमच्या कुटुंबाची सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पाडू शकाल एवढा संचय पुरेसा आहे.पण आपण चार पिढ्यासाठी साठवून ठेवत बसतो.

अचौर्य-
चोरी न करणे
दुसऱ्याच्या मालकीच्या वस्तूवर स्वतःचा हक्क सांगणे किंवा ती लुबाडणे ही एक प्रकारची चोरी च आहे.

चुका आणि क्षमा- 
क्षमा मागणे, क्षमा करणे ही वीराची लक्षणे आहेत भ्याडाची नव्हे.
चुकीबद्दल क्षमा मागीतल्याने वा क्षमा केल्याने कोणी छोटा वा मोठा होत नाही.
चुका मान्य करण्यात आपला अहंकार आडवा येतो. एखादा आपल्या चुका मान्य करीत असेल तर आपण त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी एकतर त्याला वेड्यात काढतो किंवा मग त्याच्या सदीच्छेचा आपल्या स्वार्थासाठी कसा उपयोग करून घेता येईल आणि त्यालाच तू क्षमा मागतोस म्हणजे तूच कसा गुन्हेगार असा शिक्का मारण्यात तरबेज असतो.

अहिंसा-
 अहिंसा भ्याडपणाचे नव्हे तर शूरपणाचे लक्षण आहे. समोरचा माझ्यावर हल्ला करत असताना मी समोरच्यवर प्रतिहल्ला ही करणार नाही, पळूनही जाणार नाही, समोरच्या बद्दल वैरभावही मनात आणणार नाही  आणि अन्यायही सहन करणार नाही अस महात्मा गांधी म्हणत. शारीरिक अहिंसेपेक्षाही भावनिक अहिंसा अधिक महत्वाची आहे. म्हणजे दुसऱ्यांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक पीडा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. माझ्या बोलण्यातून किंवा कृतींतून इतरांना काही त्रास होत असेल तर त्याची जाणीव होणे आणि मनाला वेदनाही होणे हे आपण योग्य मार्गावर असल्याचे लक्षण आहे असे मी मानतो.

द्वेष- कुणाबद्दल ही मनात द्वेष ठेवू नये.
सध्याच्या संदर्भात सांगायचे तर कोणी विरोधक असेल, कोणाशी वाद झाला असेल वा काही मतभेद असतील तर स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी लगेच दुसऱ्याच्याबद्दल वाईट पसरवले जाते, द्वेष केला जातो जे समाजासाठी घातक आहे. लबाडी करून तात्पुरते असे करण्यात आपल्याला यश मिळत असले तरी आपल्या या कर्माचे फळ आपल्याला इथेच भोगावे लागते हे आपण विसरून जातो.त्यामुळे द्वेषाला दूर ठेवले पाहिजे

मैत्रिभाव- 
मित्ति मे सव्व भू देसु
वैरं मज्झणम् केणवि।।

म्हणजेच सर्व प्राण्यांशी मम मैत्री
राहो न वैर कोणाशी।।
म्हणजे तो फक्त प्राणीच नव्हे तर मनुष्यही तो कोणीही असो कोणत्याही जातीचा, वा कोणत्याही धर्माचा, वयाचा, लिंगाचा , वर्गाचा असो त्याच्याप्रति मैत्रिभाव ठेवायची आज गरज आहे.वेगवेगळ्या जाती व धर्मावरुन आपल्या देशात तेढ निर्माण होत असतांना या विचारांचे अनुकरण करणे महत्वाचे आहे.

हिंसेने आणि द्वेषाने प्रश्न सुटत नसतात तर वाढत असतात हे आज जगानेही मान्य केले आहे कल्पना करा कि समजा काही देशांनी युद्ध करायचे ठरवले तर एकमेकांवर बॉम्ब टाकता टाकता जग काही मिनिटांत संपू शकते  त्यामुळे जगापुढे अहिंसा हाच एकमेव पर्याय आहे.
भ.महावीर आणि बुद्ध गेल्यावर हजारो वर्षांनी जेव्हा या अहिंसेची खिल्ली उडवली जाऊ लागली तेव्हा महात्मा गांधीनी अहिंसक चळवळीच्या माध्यमातून जगभर राज्य गाजवणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध पूर्ण देश एकत्र करून स्वातंत्र्य मिळवून दाखवले.मंडेला, मलाला, मार्टिन ल्युथर किंग यांच्यासारख्या जगभरातील अनेक लोकांनी तो मार्ग स्वीकारुन जगात बदल करून दाखवला त्यामुळेच तर जगतिक कीर्तीचा वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाइन ही म्हणाला कि महात्मा गांधींचे अहिंसक विचार च या जगाला उध्वस्त होण्यापासून वाचवू शकतील.

जगात अनेक धर्म ,पंथ स्थापन झाले काही टिकले काही लयाला गेले.बहुतांशी धर्माच्या संस्थापकांनी आम्ही देव आहोत किंवा प्रेषित आहोत म्हणून सांगितलं.
त्यांची वचन, धर्मग्रंथ प्रमाण मानले गेले.
मात्र महावीर आणि  गौतम बुद्ध यांनी  ना स्वतःला देव घोषित केले ना प्रेषित म्हणवून घेतले.
समोर आलेली गोष्ट तर्काच्या, विवेकाच्या,बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या, मी सांगतो म्हणून नव्हे तर तुम्हाला समजली आणि पटली तरच स्विकारा अस म्हणणारे बुद्ध आणि महावीर म्हणूनच आपले वाटतात
माणसांना झापडबंद न होता प्रश्न विचारायला प्रवृत्त करणारे आपले वाटतात ते ह्यासाठी.
प्रश्न विचारणारी माणस विचार करतात, अशी विचार करणारी माणस जोवर जगात आहेत तोवर महावीर आणि बुद्ध आहेत

तर शेवटी एवढेच म्हणेन कि महावीर जन्म कल्याणक निमित्त आपण ज्या ठीक ठिकाणी मिरवणूक काढतो, फ्लेक्स लावतो व अनेक गोष्टी करतो त्या चांगल्याच गोष्टी आहेत पण त्यापेक्षा अधिक गरज आहे ती त्यांचे विचार आचरणात आणायची, संप्रदायवाद, पंथवाद इ. मतभेद बाजूला ठेवून मानव म्हणून एकत्र येण्याची गरज आहे
तर चला अहिंसा, प्रेम आणि नम्रतेने जग जिंकूया, आपले नाते संबंध, समाज , देश , जग या अनुषंगाने अधिक बळकट करूया

२५ मे २०१९


संकेत मुनोत
8668975178
Changalevichar1@gmail.com

Comment, Share ,Follow and Subscribe.

Wednesday, April 13, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समज-गैरसमज

*डॉ बाबासाहेब आंबेडकर- समज-गैरसमज*

आज दिवसभर फेसबुक, whatsapp सारख्या सामजिक माध्यमातुन मित्रांशी चर्चेत अनेक समज गैरसमज आढळून आले त्याबद्दल *माझ्या अल्पअभ्यासाने  संदर्भासहित काही गोष्टी मांडण्याचा हा प्रयत्न*

शाळेत असतांना आंबेडकरांबद्दल थोडेसे आकर्षण वाटायचे ते त्यांच्या काही गोष्टी पाठ्यपुस्तकात होत्या त्यामुळे, मी आत्ता जातपात मानत नसलो तरी  *cast- open असे असल्यामुळे  आरक्षण व ईतर काही अनुभवांमुळे सुरवातीला मला आंबेडकर फक्त दलितांचेच पुढारी वाटत सोबतच  त्यांनी आपले नुकसान केले असेही वाटे.*
बी फार्मसी झाल्यावर G-PAT Entrance परीक्षेत शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी open caste मधील विद्यार्थ्यांसाठी 145 तर तर SC , NT साठी 100 च मार्क्स पाहिजे होते तेव्हा मला 140 मार्क्स पडले आणि थोडक्यात नंबर हुकला तेव्हा वाईट वाटले होते आणि आरक्षणाबद्दल चीड आली होती (पण काही काळानंतर अभ्यास केल्यानंतर आरक्षण योग्य आहे याचीही जाणीव झाली.काही लोक या आरक्षणाचा गैरफायदा घेतात व आपण त्याचे श्रेय पूर्ण समजाला देऊन बसतो हे चुकीचे आहे.)
परत आंबेडकर जयंतीला रात्री पिऊन फिरणारी मुले, आणि त्यातील ती बिभत्स गाणी ज्यात प्रबोधनाचा अंशही नव्हता उलट काही गाणी तर ईतर महापुरुषांना नावे ठेवणारी होती, त्यातील अनेक भाषणेही इतर महापुरुषांना नावे ठेवणारी होती( जसे की नोटेवर भीम चांगला दिसला असता, किंवा गांधींना शिव्या देऊन त्यावर टाळ्या मिळवणे) इ. हे पाहून आंबेडकरांबद्दलचे गैरसमज अजून वाढत गेले.

पण जस वाचन, सामजिक चळवळीतील सहभाग वाढत गेला तसे सत्य समोर येत गेले कि हे जस दाखवल जातय तस सत्य नाही.

आंबेडकर महामानव होते ते कुणा एका जातीपुरते नव्हतेच. त्यांनी आणि नेहरूंनी जर भारतीय राज्यघटना बनवण्यात मोठे योगदान दिले नसते तर आजचा भारत कदाचित वेगळा असता लोकशाही टिकली नसती.लोकशाही टिकवण्याच सगळ्यात मोठे श्रेय  गांधी ,नेहरु,  आंबेडकर आणि पटेल सारख्या महापुरुषांना जाते.

*आंबेडकरांचे नुसते कोट्यावधी रुपयांचे मोठमोठे पुतळे बांधण्यापेक्षा आणि दारु पिऊन नाचण्यापेक्षा #आंबेडकरांचे_विचार_डोक्यात_घेण्याची_वत्त्यांच्या_विचारावर_कार्य_करण्याची_जास्त_गरज_आहे.*

*महापुरुषांचा देव केला की त्याच्या अनुकरणाची गरज संपते*
कारण देव बनवल्यावर आपल्याला म्हणता येते की ते तर बाबासाहेब होते म्हणून त्यांना ते शक्य होते आपल्याला कसे शक्य होईल ते?

मागे कुणीतरी लिहले होते की *कागदावरचा बाबासाहेब सर्वानी वाचला पण बाबासाहेबांचा कागद कुणी नाही वाचला.*

*विचारांची कास धरून विवेकाशीलतेने वागून... वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारून, सुशिक्षित समाजाचे घटक व्हायला हवे*, *उत्सवासोबत च या दिवशी वही-पेन-पुस्तके ही वाटायला हवीत , रचनात्मक काम करायला हवे असे वाटते.
चळवळीतील काही मित्रांनी असे काही ऊपक्रम चालु केले आहेत त्यांचे अभिनंदन पण हा ऊपक्रम सर्व जण हाती घेतील तेव्हा कुठे डॉ.आंबेडकरांच्या स्वप्नाकडे आपण वाटचाल करु

सोबतच आंबेडकरांविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज(अफवा)आहेत तेही दुर व्हायला हवेत त्या अफवा किंवा गैरसमज खालीलप्रमाणे

*1.आंबेडकरांचे राज्यघटने मध्ये काही योगदान नाही ?*
*2.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रध्वज म्हणून भगवा झेंडा बनविण्याचा आग्रह होता*
*3.आंबेडकर सावरकरांचे कट्टर समर्थक होते,*
*गांधीहत्येनंतर आंबेडकरानी सावरकरांच्या वकिलांना गुपचूप भेटून सावरकरांना गांधीहत्येतून वाचवण्याचा प्रयत्न केला*
*4.आंबेडकर कडवे मुस्लिम धर्मविरोधी होते*
*5.आंबेडकर ब्राम्हण होते व नंतर बौध्द झाले*
*6.आंबेडकर आणि गांधी एकमेकांचे कट्टर शत्रू होते*
तर विस्ताराने खालीलप्रमाणे

1)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत काही योगदान दिले नाही, आपली घटना फकत दुसऱ्या देशातील घटनांची कॉपी पेस्ट आवृत्ती आहे ?

उत्तर-
हे साफ खोटे आहे , भारतीय राज्य घटना तयार होण्यासाठी २२ समित्या निर्माण केल्या होत्या, या सर्व समित्यांचे यात खूप मोठे योगदान आहे. ब्रिटिश जाताना आम्हीच भारताचे संविधान तयार करू असे म्हणत होते. महात्मा गांधींनी त्याला ठाम विरोध केला आणि आमचे संविधान आम्ही बनवणार हे ठणकावून सांगितले. जर हे झाले नसते तर ५०० पेक्षा जास्त राजांना त्यांचे राज्य चालवण्याचे अधिकार मिळाले असते आणि भारत कधीही एकसंध झाला नसता.आपण स्वतः आपले संविधान बनवल्यामुळे हे शक्य झाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ राजेंद्रप्रसाद आणि यासारखे अनेक विद्वान या निर्मिती प्रक्रियेत होते म्हणून आपले संविधान उत्तम झाले 

2)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रध्वज म्हणून भगवा झेंडा बनविण्याचा आग्रह होता-

उत्तर - हे साफ खोटे आहे

१० जुलै १९४७ ची गोष्ट.बाबासाहेब दिल्लीला जायला निघालेले.ते विमानात बसतेवेळी हिंदूमहासभेच्या पुढाऱ्यांनी त्यांना भगवा ध्वज अर्पण केला व आपल्या राष्ट्रध्वजाचा रंग भगवा असावा यासाठी प्रयत्न करण्याची विंनंती केली .त्या वेळी हिंदू महासभेचे नेते रावबहादूर सी.के.बोले,अनंतराव गद्रे यांना डॉ.बाबासाहेब विनोदाने म्हणाले ,"मला महाराच्या पोराला पुढे करुन तुम्ही मागे राहणार काय??दिल्लीला चला तेथे यासाठी जोरदार निदर्शने झाली पाहिजेत"मी माझ्याकडून शक्य ते सारे करेंनच" आणि आपण पाहताच आहोत बाबासाहेबांनी भगव्या ध्वजाऐवजी अशोक चक्रांकित तिरंगी झेंड्याचा स्वीकार देशासाठी केला म्हणजे अर्थात त्यात ती निवड नेहरूंची होती पण बाबासाहेबांनी त्याला विरोध केला नाही.                                       (संदर्भ-डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ)

3) आंबेडकर सावरकरांचे कट्टर समर्थक होते,
गांधीहत्येनंतर आंबेडकरानी सावरकरांच्या वकिलांना गुपचूप भेटून सावरकरांना गांधीहत्येतून वाचवण्याचा प्रयत्न केला.

सत्य -
हे साफ खोटे आहे ऊलट सावरकरांनी आंबेडकरांचा ऊल्लेख बाटगा असा केला आहे.
ब्रिटिशांची माफी मागून येणाऱ्या सावरकरांनी जशी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर टीका केली तशीच त्यापेक्षाही जास्त टीका डॉ. आंबेडकरांवर केली आहे, त्यांचे लेखन वाचले तर असे अनेक संदर्भ मिळतील
सावरकरांच्या जात्युच्छेदक निबंध या पुस्तकातील उतारा संदर्भासाठी देत आहे
*"डॉ आंबेडकर हि व्यक्ती भिक्षु आंबेडकर झाली तरी त्याचे कोणाही हिंदूस कोणचेही विशेष सोयर सुतक बाळगण्याचे कारण नाही . ना हर्ष ना विमर्श, जेथे बुद्धाने हात टेकले तेथे आंबेडकर कोणत्या झाडाचा पाला I"(उक्त पृ .२२३)*
तर सावरकरांबद्दल बाबासाहेबांनी म्हटलेले आहे कि सावरकरांनी काय कोणीही अपप्रचार करण्याऐवजी मला बुद्धासंबंधी उघड विचारावे असे आवाहन बाबासाहेबांनी केले होते त्यांनी म्हटले होते कि
*"तेव्हा अश्या नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये.काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले पण मी म्हणतो सावरकर आपल्या पोटातील नरक ओकले(उक्त-2 जून 1956)*
गांधींजींशी वैचारिक मतभेद असले तरी हत्येचे दुःख आंबेडकरांना ही झाले होते आणि डॉ. आंबेडकर जे करायचे किंवा बोलायचे ते उघड उघड बोलत किंवा करत  हे आपल्याला त्त्यांच्या लेखनातूनही दिसून येईल त्यामुळे सावरकरांच्या वकिलांना असे गुपचूप भेटण्याचा प्रश्नच येत नाही.

4)आंबेडकर कडवे मुस्लिम धर्मविरोधी होते

सत्य-आंबेडकरांनी अनेक धर्मांची चिकित्सा केली आहे त्यात ईस्लामबद्दलही लिहले आहे-
बाबासाहेबांचे इतर लेखन वापरून हिंदू कट्टरवाद्यांकडून सामान्य मुस्लिमांना झोडपण्याचे काम सुरुये.हाच प्रकार सामान्य हिंदूंच्या बाबतीत "रिडडल्स इन हिंदुइसम"व बाबासाहेबांचे इतर लिखाण वापरून त्यांना झोडपण्याचे काम गैरहिंदू कट्टरवाद्यांकडून होतेय. खरे तर त्यांची विचारसरणी हि बुद्धिप्रामाण्यवादावर आधारित विचारसरणी आहे जी कोणत्याच धर्मातील कट्टरवाद्यांना झेपणारी नाही.

5)"आंबेडकर ब्राम्हण होते व नंतर बौध्द झाले"
अनेक मित्रांकडुन मी ही गोष्ट ऐकली आहे

सत्य - हसावे कि रडावे हे ऐकून असा हा गैरसमज आहे पण खूप सामान्य जणांमध्ये हा गैरसमज आहे 
जो कुणी हुशार तो आमच्याच जातीचा अस बोलणार्या गटांनी 'हे गैरसमज पसरवले आहेत , त्यांच्या आडनावात 'कर' म्हणुन ते ब्राम्हण असेही अनेक लोक समजतात पण ते खोटे आहे त्यांचा जन्म महार जातीत झाला होता.आणि त्यांना कोणत्या हालअपेष्टा सोसाव्या लागल्या हे आपणास माहीतच असेल.

6)आंबेडकर आणि गांधी एकमेकांचे कट्टर शत्रू होते
सत्य - 
हेही साफ खोटे आहे , गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात मतभेद निश्चितच होते पण मनभेद नव्हते.त्यांचे काही विचार एकमेकांशी भिन्न तर काही विचार एकमेकांना पूरक होते..
*ज्या काळात आंबेडकरांनी दलितांमधील न्युनगंड घालवून त्यांना माणूसपण बहाल केले, त्याच काळात म.गांधींनी स्पृश्य माणसातील अहंगंड कमी करून त्याच्यातील पशुत्व नष्ट केले.या दोन्ही गोष्टी एकाच वेळी झाल्याने सामाजिक अन्याय मोठ्या प्रमाणात कमी झाला.*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४. ११.१९३२ रोजीचे बोटीवरून पत्र  लिहिले होते त्यात त्यांनी म्हटले आहे
*"माझा बहुतेक वेळ गांधीजींची अस्पृश्यता निवारक पत्रके वाचण्यात जातो. पत्रकांतील विचार वाचून गांधीजींच्या विचारांत केवढी तरी क्रांती घडून आल्याचे दिसून येते. गांधीजींना आता `आपला माणूस' म्हणावे. कारण ते आता आपली भाषा व आपले विचार बोलू लागले आहेत.अस्पृश्यांच्या हालअपेष्टांचे गांधीजींनी एका पत्रकात केलेले यथार्थ वर्णन वाचीत असता मला वाटते की `समता' अगर `बहिष्कृत भारत' या आपल्या पत्रातील काही लेखांचे इंग्लिश भाषांतरच जणू वाचत आहोत."* [संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा
*- शंकरराव खरात*- पृ १७७]

"कुणी एका गालावर मारले तर तर दुसरा गाल पुढे करा" असे गांधीजींनी ब्रिटिशांबद्दल नाही तर  अस्पृश्यतानिवारण चळवळीत म्हटलेले वाक्य आहे हे किती जणांना माहित आहे?

*सवर्ण हिंदुंनी दलितांवर एवढे अत्याचार केले आहेत की त्यामुळे चिडून कोण्या दलिताने मला सवर्ण हिंदू समजून माझ्या एका गालावर मारले तर मी त्याचा प्रतिकार करणार नाही उलट दुसरा गाल पुढे करेल,आणि तरीही आम्ही केलेल्या पापाचे परीमार्जन होणार नाही असे महात्मा  गांधी म्हणाले होते.*
 गांधीजींचा खून ही गोडसेने सावरकरांच्या आदेशावरून अस्पृश्यतानिवारणाचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी केला होता.55 कोटी, फाळणी हे सर्व बनाव आहेत कारण गांधीजींवर पहिला हल्ला 25 जून 1934 रोजी पुण्यातील सनातन्यांनी  गांधीजींनी केलेल्या मंदिरे सर्व जातींना उघडी करा या आवाहनाला विरोध करण्यासाठी केला होता तेव्हा 55 कोटी किंवा फाळणी कसलाच प्रश्न नव्हता.
गांधीजींच्या उपोषणामुळे जी मंदिरे, विहिरी शेकडो वर्षे अन्य जातीसाठी बंद होती ती गांधीजींच्या उपोषणामुळे काही वर्षात खुली झाली. लोक एकत्र येऊ लागले आणि अनेक चांगल्या गोष्टी झाल्या. गांधीजींनी साताऱ्यातील वाई येथे स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह केला तेव्हाच पुण्यात सनातनी ब्राम्हण लोकांनी सभा घेऊन गांधींचा निषेध करत त्यांच्यावर सडकून टीका केली होती पण गांधी घाबरले नाहीत. त्यानंतर लगेच 1934 मध्ये सनातनी लोकांनी त्यांच्यावर बॉम्ब टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. 

सुरेश सावंत सरांनी याबाबत लिहले आहे
गांधीजींशी बाबासाहेबांचे मतभेद काय होते, ते किती तीव्र होते, हे आपण पाहिले. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे स्वातंत्र्य काँग्रेसला मिळालेले नसून देशाला मिळाले आहे आणि म्हणून पहिल्या मंत्रिमंडळात देशातील विविध राजकीय प्रवाहांचे प्रतिनिधीत्व असायला हवे ही भूमिका घेण्यात गांधीजींचा पुढाकार होता. बाबासाहेबांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्याची सूचना गांधीजींचीच होती, घटना समितीत बाबासाहेब निवडून आले तो मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यावर दुसऱ्यांदा ते निवडून आले ते मुंबई इलाख्यातून. यासाठीचे सहकार्य काँग्रेसने दिले होते. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब निवडले गेले. यामागेही गांधीजी होते,
लखलखीत गुणवत्तेमुळेच बाबासाहेबांना हा बहुमान मिळाला, हे उघडच आहे. तथापि ते गांधीजीमुळेच शक्य झाले नाहीतर टाळणेही शक्य होते (आत्ता वेगवेगळ्या खात्यावर कोणतीही गुणवत्ता नसणारे कसे लोक भरले आहेत हे आजही आपण पाहु शकता ते FTII, RBI असो वा ईतिहास संशोधन खाते, रघुराम राजन सारखी हुशार व्यक्ती ही हटवली जाते हे आपण पाहतोच),राष्ट्रीय हिताचा विचार करताना मतभेद आड येऊ देता कामा नये, या गांधीजींच्या भूमिकेचा यथोचित आदरही करायला हवा.

ज्या मूल्यांवर आधारित संविधान तयार करण्यासाठी बाबासाहेब हवे असे गांधीजींना वाटत होते, ती मूल्ये या दोघांची समान होती. संविधानाच्या प्रास्ताविकात नमूद झालेली ती हीच दोहोंची सामायिक मूल्ये. जर त्या काळात तीव्र मतभेद असतानाही या सामायिक मूल्यांसाठी ते एकमेकांना सहकार्य करत होते, एकत्र काम करत होते, तर आज ही मूल्ये धोक्यात आलेली असताना त्यांच्या वारसदारांनी परस्परांत तसेच सहकार्य का करु नये?

 बाबासाहेबांनी जर त्यावेळी गांधीजी किंवा नेहरु यांच्या सगळ्या भूमिका पटल्या तरच मी घटना लिहीन अशी अट ठेवली नाही किंवा गांधी-नेहरुंनी बाबासाहेबांकडून ठेवली नाही, तर आपण तरी ती आज का ठेवावी? ते जसे परस्परपूरक राहिले, तसेच आपणही राहू शकतो

मार्क्स, गांधी, आंबेडकर तसेच अन्य महामानव यांच्या वैचारिक समन्वयाचा आग्रह न धरता त्यांच्यातील परस्परपूरकत्व शोधणे व त्या पायावर व्यापक एकजुटीचा कार्यक्रम आखणे आणि आपल्या संविधानातील प्रगत मूल्यांना आव्हान देणाऱ्या शक्तींना पराभूत करणे हा संकल्प बाबासाहेबांच्या १२६ व्या जयंतीनिमित्ताने आपण करायला हवा.

असो  डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन

वरील लिखाणात काही चुकले असल्यास क्षमस्व

जय भीम , जय भारत , जय जगत



संकेत मुनोत
8087446346
14-एप्रिल-2017

Comment, Share ,Follow and Subscribe.

Sunday, April 3, 2022

#काम_की_बात- आजार लपवणे

एखादा आजार झाल्यावर, त्यावर हजारो किंवा लाखो रु खर्च समजल्यावर अनेकांना आरोग्य विमा काढण्याचे आठवते मग ते आरोग्य विमा पॉलिसी काढताना तो आजार मुद्दामून लपवून ठेवतात किंवा आहे किरकोळ तर कश्याला सांगायचे म्हणून सांगत नाहीत.किंवा काही agent किंवा advisor ही फॉर्म भरतांना त्यातील सगळे प्रश्न विचारत नाहीत .

पण कुठलाही आजार अस्तित्वात असल्यास तो सांगायलाच हवे आणि agent ने ही ते विचारायलाच हवे कारण यात नंतर त्या policy holder चे नुकसान असते, कारण आजार नाही सांगितला तरी तो insurance कंपनीला कुठून ना कुठून समजतोच किंवा डॉक्टरांच्या मेडिकल हिस्टरी रिपोर्ट  मध्ये तो दिसतो त्यामुळे तुम्ही आजारी पडल्यावर जर त्यासाठी claim केले तर तो claim तर रिजेक्ट होऊ शकतोच पण सोबत तुमची पॉलिसी सुद्धा रद्द होऊ शकते. 
त्यामुळे तुम्हाला जे काही आजार अस्तित्वात असतील तर ते मेंशन करा . कुठला प्लॅन घेतोय त्यानुसार त्याचा waiting period 3-4 वर्षे असतो. तेवढे वर्ष त्या आजारासंबंधीत काही झाले तर कव्हर होणार नाही त्यानंतर त्या आजाराचा खर्च ही त्यात कव्हर होतो
शिवाय काही असे health insurance प्लॅन्स पण आहेत त्यात पहिल्या वर्षी थोडे अधिक premium देऊन तुम्ही तो waiting period कमी करण्यासाठी अर्ज करू शकता ज्यामुळे तुमचा त्या आजराचा खर्च ही पुढच्या वर्षीपासून किंवा महिन्यापासून कव्हर होईल.

त्यामुळे health insurance काढताना नुसता काढायचा म्हणून काढू नका तर ही काळजी पण घ्या

हे लिहावे लागले कारण आत्तापर्यत 2-3 फोन यासंदर्भात आले ते की त्यांचा claim रिजेक्ट झाला , मी म्हटलं आपण ज्यांच्याकडून काढला आहे ते काय म्हणत आहेत तर म्हणे कि ज्या बँकेत खाते होते त्यात एका कर्मचाऱ्याने जास्त आग्रह करून घ्यायला लावला आणि आता जेव्हा याबद्दल विचारायला गेलो तर म्हणतो insurance department वेगळे आहे त्यांना विचारा. Insurance department सांगते कि आम्हाला काही माहीत नाही तुम्ही आजार लपवला म्हणून आम्ही रिजेक्ट केले .
माझे मत- आजार लपवणे ही पहिली चुकी आणि दुसरी चुकी ही कि जास्त माहिती न घेता त्या बँक कर्मचाऱ्याकडून तो घेणे.बँक खात्यात सेविंग करणे, लोन काढणे किंवा अजून इतर काही बँकेची कामे करणे या गोष्टी कराव्यात पण हेल्थ इन्शुरन्स मात्र स्वतंत्र हेल्थ इन्शुरन्स वर कार्य करणाऱ्या कंपनीकडूनच घ्यायला हवा.लोक ऑनलाईन जाहिरातींना ही याबाबत खूपदा बळी पडतात पण मग जेव्हा सर्व्हिस ची वेळ येते त्यावेळेस त्रास होतो. मोबाईल किंवा एखादी अन्य वस्तू तुम्ही ऑनलाईन खरेदी केली ते चालू शकते पण जिथे सेवेची आणि योग्य सल्ल्याची गरज आहे अश्या ठिकाणी त्यातील तज्ञ व्यक्तीकडूनच तो घ्यायला हवा जसे की डॉक्टर, वकील, आणि आरोग्य विमा सल्लागार. अजून त्याची निवड करतांना काय-काय करावे हे यापूर्वीच्या लेखात सविस्तर लिहले आहेच तर आरोग्य विमा काढताना ही काळजी घ्या नाहीतर त्या एका आजार लपवल्यामुळे तुमचे इतर शेकडो आजार कव्हर होणार नाहीत ज्यांचा खर्च ही लाखोंच्या घरात असतो.


©संकेत मुनोत
Financial Planner & insurance Advisor 
Sanket.insurance@gmail.com
8668975178

Share
Comment, Share ,Follow and Subscribe.